मा. शरद पवार यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य

Information world
0

 

 मा. शरद पवार यांचे सामाजिक व  शैक्षणिक कार्य

 मा. शरद पवार यांचे  सामाजिक कार्य

 साधारण १९५६ सालापासून पवार साहेबांनी राजकीय जीवनात प्रवेश केला. काँग्रेसचे सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे २४ वर्षे. पुढे जाऊन १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८ च्या मध्यापासून. पुलोदचा प्रयोग करत त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापले आणि देशातले ते सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले.

 १९९१ साली मी खर्‍या अर्थाने त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात हा मुद्दा घेऊन १९९१ साली मी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. पुढे काँग्रेस पक्षापासून फारकत घेत पवार साहेबांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळी आम्ही अनेक सहकार्‍यांनी एका पाउलावर पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने राज्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा पाया घातला. राज्याच्या विकासाचा एक रोडमॅप त्यांनी आखून दिला. पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांनी त्या रोडमॅपचा पुढे विस्तार केला आणि महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा अधिक बळकट केली. याच परंपरेचे एक महान पाईक असलेल्या पवार साहेबांना यशवंतराव चव्हाण यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला होता.

 त्यांच्याच आशीर्वादाने पवार साहेबांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी राजकारण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीच्या उत्थानाची सुरवात केली. समाजमनाची नेमकी जाण असलेल्या या नेत्याने शेतकरी, कष्टकरी, दलित, शेतमजूर, दुर्बल, मागासवर्गीय, उपेक्षित अशा वंचितांच्या उत्थानासाठी स्वतःला वाहून घेतले.

१ नोव्हेंबर १९९२ ला मी सामाजिक कार्यासाठी समता परिषदेची स्थापना केली. १९९३ मध्ये समता परिषदेचा पहिला मेळावा आयोजित केला. जालना येथे झालेल्या या मेळाव्यात अध्यक्षपदी स्वत: पवार साहेब होते. तत्कालीन केंद्रीय समाजकल्याण मंत्री सीताराम केसरी तसेच रामदास आठवले, शिवाजीराव शेंडगे, मधुकर पिचड या मान्यवरांसह सुमारे २ लाखांहून अधिक समता सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याच मेळाव्यात आम्ही मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव केला आणि पवार साहेबांकडे तशी मागणीही केली. 

त्यानंतर तातडीने त्यांनी १९९४ साली मंडल आयोग लागू केला आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या तमाम मागासवर्गीय बांधवांना झाला. मंडल आयोगाची मागणी यशस्वी झाल्यानंतर त्याचा आनंद सोहळा आम्ही १९९४ साली अमरावतीमध्ये घेतला होता. याच मेळाव्यात मंडल आयोग लागू केल्याबद्दल पवार साहेबांचे आम्ही महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या वतीने आभार मानले. यावेळी तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री मुकुल वासनिकदेखील उपस्थित होते.

शरद पवार साहेबांना देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, विज्ञान, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्राविषयी सखोल जाण आहे. भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवार यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्षे काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. 

एके काळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे. देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. याकरिता शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिक स्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पवारांनी पोहचविले.

प्रशासकीय कामकाजात हातखंडा असलेल्या पवार साहेबांनी सामाजिक क्षेत्रासाठीसुद्धा मोठे काम केले आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने प्रभावीपणे केली होती. त्यासाठी मोठा लढा उभारावा लागला यात पवार साहेबांनी पुढाकार घेतला 

जुलै १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. मराठावाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या काळात मराठवाड्यात दंगली पेटल्या होत्या, त्या शांत करुन लोकांमध्ये जातीय सलोखा घडवणे अतिशय गरजेचे होते. पवार साहेबांनी त्यातही मोलाची कामगिरी करून दंगली थांबवल्या. त्यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सदस्यांनीसुद्धा मराठवाड्यातील गावांगावात जाऊन जातीय सलाोखा निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले होते. ओबीसी समाजाच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहे.

राज्याचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेत खर्‍याखुर्‍या लाभार्थींना सामील करून घेतले पाहिजे, हा यशवंतराव चव्हाण यांचा विचार समोर ठेवून पवार साहेबांनी या सत्तेच्या विकेंद्रीकरणाला अधिक व्यापक स्वरुप दिले. निर्णयप्रक्रियेत महिला तसेच मागासवर्गीयांना सामावून घेण्यासाठी या दोन्ही वर्गांसाठी आरक्षण लागू केले. त्यामुळे आज सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये या दोन्ही वर्गांना आपल्या आशा-आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हक्काचे स्थान मिळाले आहे. 

मला आठवत की आम्ही नागपूरला समता परिषदेचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्यात शरद पवार यांनी राज्यपातळीबरोबरच आता ओबीसींचे संघटन करण्यासाठी देशपातळीवर मेळावे घ्यावे, असा सूचनावजा आदेशच दिला. त्यानंतर लगेचच २००५ मध्ये रामलीला मैदान दिल्ली येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात केंद्रीय शिक्षण संस्था, नोकर्‍यांमध्ये ओबीसींना राखीव जागा देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मेळाव्यास शरद पवार, लालू प्रसाद यादव, शरद यादव यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर तसेच ५ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. यानंतर बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश येथे मेळावे घेण्यात आले होते.

गेल्या १४ वर्षांपासून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणार्‍या लोकांना समता पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. त्यात वीरप्पा मोईली, अरुंधती रॉय, कुमार केतकर, शरद यादव, भालचंद्र नेमाडे, हरी नरके, उत्तम कांबळे, भालचंद्र मुणगेकर यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. सन २०१८ सालचा समता पुरस्कार हा पवार साहेबांना आम्ही देण्याचे ठरवले आणि अतिशय सन्मानाने तो त्यांनी स्वीकारला.

संकटाच्या काळात खचून न जाता विपरीत परिस्थितीवर विजय कसा मिळवायचा, पुन्हा विकासाच्या दिशेने झेप कशी घ्यायची याचा आदर्श महाराष्ट्रातील जनतेसमोर मागच्या वर्षीच शरद पवार यांनी उभा केला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने २०१४ पासून असलेल्या सत्तेचा गैरवापर केला. या सत्तेचा वापर करून भाजपने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पूर्णतः नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद यातील सर्व तंत्राचा वापर केला गेला. पण महाराष्ट्राच्या जनतेने कौल काही वेगळाच दिला. मोठा पक्ष असूनसुद्धा भाजपाला सत्ता स्थापन करता आली नाही. शरद पवार यांच्या असाधारण योगदानातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.

आज वयाच्या ८० व्या वर्षी तरुणालाही लाजवेल, अशा उत्साहाने पवार साहेब रात्रंदिवस काम करत असलेले दिसतात. शरद पवार साहेब म्हणजे राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजविण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभच आहेत. 

 मा. शरद पवार यांचे शैक्षणिक कार्य

पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था

  1. विद्या प्रतिष्ठान, बारामती (इंग्लिश मजकूर)
  2. कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती (इंग्लिश मजकूर)
  3. रयत शिक्षण संस्था, सातारा (इंग्लिश मजकूर)
  4. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे (इंग्लिश मजकूर)
  5. शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव, बारामती (इंग्लिश मजकूर)
  6. मा. शरद पवार यांचे बालपण शालेय व महाविद्यालयीन जीवन

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)